हैदराबादमधील आगीत ८ मुलांसह १७ जणांचा मृत्यू   

चारमिनारजवळील भीषण घटना

हैदराबाद : येथील जगप्रसिद्ध चार मिनारजवळील एका इमारतीला रविवारी सकाळी भीषण आग लागून आठ मुलांसह १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
 
गुलझार हाऊस इमारतीला आग लागली होती. तळमजल्यावर दागदागिन्यांची दुकाने होती. वरच्या मजल्यावर सदनिका होत्या. या इमारतीतून बाहेर पडण्यासाठी एकमेव अरुंद जिना होता. त्यामुळे नागरिकांना बाहेर पडता आले नाही. तेलंगणा राज्य आपत्ती प्रतिक्रिया आणि आग नियंत्रण सेवा विभागाचे महासंचालक वाय नागी रेड्डी यांनी घटनास्थळी भेट दिली असून त्यांनी सांगितले की, सकाळी ६ ते ६.१५ दरम्यान आग लागल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर दुसर्‍या मिनिटाला अग्निशमन दलाच्या वाहनांनी धाव घेतली. ६ वाजून १७ मिनिटांनी दल घटनास्थळी पोहोचले होते. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात उघड होत आहे. 
 
ते म्हणाले, आग लागली तेव्हा इमारतीत २१ जण होते. १७ जणांना गंभीर आणि बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. अरुंद जिना असल्यामुळे नागरिक बाहेर पडू शकले नाहीत. आग इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर लागली होती. आगीची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाला मााहिती देण्यात आली. अनेक जण गुदरमरल्याने बेशुद्ध पडले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले. चार कुटुंबे एकमेकाची नातलग होती. त्यापैकी काही जण सुट्टीसाठी इमारतीत राहण्यासाठी आली होती. 
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हळगळ व्यक्त केली असून एक्सवर दु:ख व्यक्त करणारी पोस्ट टाकली आहे. मृतांच्या कुटुंबांना २ लाख रुपयांची आणि जखमींसाठी ५० हजार रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी दु:ख व्यक्त केले. इमारतीत आडकलेल्या रहिवाशांचा शोध घेण्याचे आणि आगीचे कारण शोधण्याचे आदेश त्यांनी ज्येष्ठ अधिकार्‍यांना दिले. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी नागरिकांनी  त्यांच्याकडे अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेवर आल्या नसल्याची तक्रार केली. मुख्यंमत्री कार्यालयाने जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्याचे आदेश दिले. तसेच तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले.

कुटुंबे १२५ वर्षे राहिली : ओवेसी

हैदरबादचे खासदार आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले की, इमारतीत गेल्या १२५ वर्षांपासून कुटुंबे राहत आली आहेत.  त्यांच्या अनेक पिढ्या किमान १०० वर्षे तरी येथे नांदल्या आहेत.
 

Related Articles